महाराष्ट्र

विधानसभा लक्षवेधी

पुण्यालगतच्या वाघोली, मांजरी भागासाठी नवीन महानगरपालिका स्थापण्याबाबत शासन सकारात्मक

  उपमुख्यमंत्री अजित पवार

     

मुंबई, दि. 11 : पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली.                                                                                          

सदस्य अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा आदि समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

पुणे शहरामध्ये काही गावे समाविष्ट करण्याची त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे .परंतु या कामाला गती देण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुणे महानगर क्षेत्रातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे .वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव  5 एमएलडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे .पुणे- शिरूर -अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री अशोक पवार, बबनराव पाचपुते, भीमराव तापकीर व राहुल कुल यांनी चर्चेत भाग घेतला.

००००

बनावट प्रस्तावावर शालार्थ क्रमांक दिल्याप्रकरणी

नाशिक विभागातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी – प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 11 : बनावट प्रस्तावावर शालार्थ क्रमांक दिल्याप्रकरणी नाशिक विभागातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

  

नाशिक विभागात अनेक ठिकाणी बनावट प्रस्तावांवर शालार्थ क्रमांक देताना झालेल्या गैरव्यवहाराबाबत आमदार किशोर पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड यांनी ही माहिती दिली.

        

जळगाव जिल्ह्यातील सहा शाळांनी चुकीच्या पद्धतीने संच मान्यताप्राप्त केल्याची तक्रार आल्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येऊन चौकशी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बनावट स्वाक्षरी प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बनावट प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थांचे वेतन अनुदान थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट प्रस्तावांवर शालार्थ क्रमांक दिलेल्या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नव्हती तसेच तेच तेच विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये दर्शविले गेले. शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव गेल्याची नोंद दिसून आली नाही तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव आल्याचीही नोंद दिसून आलेली नाही. याप्रकरणी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना निलंबित करीत असल्याचे शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

शालार्थ क्रमांक देताना होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.शालार्थ क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येईल आणि बायोमेट्रिकद्वारे प्रमाणित करण्यात येईल.राज्यात जिथे जिथे असे गैरव्यवहार झालेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असेही मंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा सदस्य किशोर पाटील ,सुनील प्रभू आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/11.3.2020

Most Popular

To Top