महाराष्ट्र

असा होता आठवडा (दि. 15 ते 21 मार्च, 2020)



गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)
दि. 15 मार्च, 2020 

·      भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो जलवाहतूक सेवा राज्याच्या किनारपट्टीमध्ये फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन, भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा सुरू.

·      आंबेडकरी  चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो ; सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना शोक.

·      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व पडद्याआड झाल्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची शोक प्रतिक्रिया. 

·      मास्क,हॅन्ड सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास, कारवाई करण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ यांची घोषणा.

****

दि. 16 मार्च, 2020

·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात निर्जंतुकीकरण अभियान.

·      आयुष्यमान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे, राज्य आरोग्य हमी सोसायटी तर्फे आवाहन.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरसिंग. उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित, महत्वाचे निर्देश :- कोरोनाग्रस्त व्यक्तिंना  योग्य औषधोपचार आणि मानसिक आधार द्या, साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी मोहिमा हाती घ्या, जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांना मानसिक आधार द्या, क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्या, धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नका, ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्या, कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता सर्व धार्मिक उत्सव रद्द करा, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधीशिवाय भाविकांसाठी प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करा, व्यापक जनहित लक्षात घेऊन कायद्याचा वापर प्रभावीपणे करा, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करा. निर्णय : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव, कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार, ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, त्यामुळे समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल, केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्यशासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश, आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार, मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश न देण्याचा निर्णय, नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत, होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक, धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करणार.

·      कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर, मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद.

·      राजभवन भेट योजना 31 मार्च पर्यंत स्थगित.

·      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद;महाविद्यालये, विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा ३१ मार्चनंतर होणार असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.

·      अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी  सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक. शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीने करण्याचे श्री. चव्हाण यांचे निर्देश.

·      सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्यामार्फत विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा, धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे श्री. चव्हाण यांचे निर्देश. 

·      नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबत जागरुकता दाखवून जलस्त्रोतांची  जपणूक करावी, असे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांचे आवाहन.

·      यवतमाळ आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण, राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३९ वर, राज्यात १०८ जण विलगीकरण कक्षात दाखल, अशी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

*****

दि. 17  मार्च 2020

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद :- कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू,  उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर,  32 जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. रुग्णांमध्ये 28 पुरुष असून 13 स्त्रिया, मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल, सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना मर्यादित स्वरुपात काम करण्याच्या सूचना,  शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील, भाजीपाला दुकाने सुरु राहतील, कोरोना प्रतिबंधासाठी शासन प्रभावी उपाययोजना करीत असून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची कार्यपद्धती मान्य,  रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही.  मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी प्रवास करावा, औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांचे संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य, कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरवणार, गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार, खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरु राहील, मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना, सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर तपासणी सुरु, विलगीकरणाची पुरेशी व्यवस्था, शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये कमी दरात विलगीकरण सुविधेची उपलब्धता, कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी, सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश, साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचा समावेश.

                                मंत्रीमंडळ निर्णय  

·      अपार्टमेंट्स मालकांना अपिल करण्यासंदर्भातील अधिकार.

·      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद.

·      महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करणार.

·      हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड, जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे  मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांना शोक.

·      ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने चतुरस्त्र अभिनेता हरपला असल्याचा  उपमुख्यमंत्री  श्री. अजित पवार यांच्याद्वारे शोक संदेश

·      कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याची राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा.

·      कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे, महाविद्यालये दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची परवानगी.

·      कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये राज्यशासनासोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक, महत्वाचे मुद्दे :- कंपन्यांच्या बैठका व्हर्चुअलीघेतानाच वर्क फ्रॉम होमकार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांकडून मान्य. औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेंन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात येणार,  रुग्णांच्या आयसोलेशनसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या कंपन्यांच्या प्रतिनिधींची तयारी,  अत्यावश्यक औषधे कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्याचे मान्य, अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा, आस्थापना, कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस, कोरोनाच्या जाणीव जागृतीसाठी खासगी कंपन्यांनी तयारी, ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे, त्यांच्यासाठी विशेष सोय,  कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी  शासनाची  परवानगी.

·      कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नसल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती.

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर.

·      उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची, मंत्रालयातील दालनातून कामकाजाला सुरूवात, मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूर पोलीस  शिपाई श्री. अरुण जाधव यांचा सत्कार.

·      नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स)मध्ये बाहयरुग्ण सेवेस सुरुवात झाल्याचे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांचे लोकसभेत निवेदन.

·      कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवडला प्रत्येकी १ नवा रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४१; मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती, गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात.

·      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन.www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरण्याची सुविधा,तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२.

·      गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  कोरोनाप्रसाराविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, महत्वाचे मुद्दे :- कारागृहातील बंद्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक, नवीन दाखल होणाऱ्या प्रत्येक बंद्याची प्राथमिक तपासणी करुन स्क्रीनिंग करावे. आवश्यकता असल्यास त्यांना अन्य बंद्यांपासून विलग ठेवा,  प्रत्येक कारागृहामध्ये सर्दी, फ्ल्यूसारखे आजार असलेल्या बंद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवा, मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील बंद्यांना थेट तळोजा कारागृहातच भरती करा, कारागृहातील बंद्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बंद्यांची अधिक संख्या असलेल्या कारागृहातून त्यांना इतर कारागृहात हलवा, बंद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना भेटण्याची सुविधा बंद करा, या कालावधीत सर्व गुन्ह्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यासाठी न्यायालयाला विनंती करा.

·      सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या, विनाकारण साठा करू नका, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन.

·      अतिरिक्त प्रवासभाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांचे निर्देश.

·      कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबरतर्फे कारवाई.

·      कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची, अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार यांची घोषणा.

****


दि. 18 मार्च, 2020

·      जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार आणि साठेबाजी  करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची घोषणा.

·      कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी देण्याचा निर्णय.

·      जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर, बदल्यांसंदर्भातील धोरण लवकरच जाहीर करण्याची  ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा.

·      अर्थसंकल्पात घोषित साकोली येथील नवीन कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीसंदर्भात तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० खाटांवरुन १०० खाटांमध्ये वाढविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·      कोरोनापार्श्वभूमिवर वेळापत्रकात बदल, कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी दि. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान  मुंबईत करण्याचा निर्णय.

·      कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार असल्याची,  अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची घोषणा.

·      पुण्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 42 झाल्याची  आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता विकसित महाडीबीटीपोर्टलचा कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्याद्वारे आढावा.

·      कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये, अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या विद्यापीठे आणि महविद्यालयांना सूचना.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू नियंत्रणासंदर्भात बैठक. महत्वाचे मुद्दे :- शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील,  रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना, मुंबईमध्ये बेस्ट मधील उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील,  प्रवासी अंतराने बसावेत यासाठी प्रवाशांना सूचना, शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था,शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतराअंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील,  बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल,आवश्यक तेवढे अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री उपलब्ध, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी,  परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.

·      राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने, तपासणीसाठी लॅब सुरु करणार, राज्यात 700 व्हेंटिलेटर, 600 आयसोलेशन बेड्स तयार,  केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५०विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.

·      कोरोनाच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाकडून परिपत्रक निर्गमीत.

·      सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री  श्री. राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला भेट देवून पाहणी,  या रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिकांचे  आभार मानले.

****

दि. 19 मार्च, 2020

·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरुन लाईव्ह प्रसारण :-  कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध, याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनतेचे शासनाला सहकार्य,  त्यामुळे ही साथ नियंत्रणात, मात्र आणखी  शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्राची या  संकटावर मात शक्य,  जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांचा साठा करण्याची गरज नाही, सरकार ज्या ज्या सूचना देत आहेत त्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत, गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये,आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे. वॉर अगेंस्ट व्हायरस. युद्ध सुरु,आपले जवान म्हणजे डॉक्टर, नर्सेस, बसचे चालक, स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांना घरी राहून सहकार्य करा.

·         कोरोना विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा भारतीय दंत संघटने (इंडियन डेंटल असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांच्या दंतवैद्य चिकित्सकांना सूचना.

·         जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन देण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

·         वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महत्वाचे मुद्दे :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात 700, मुंबईत 200 आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून 430 असे राज्यभरात एकूण 1 हजार 330 बेड असलेले विलगीकरण कक्ष‘ (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार, पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे. जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या 3 दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार,  औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या 6 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या 15 दिवसात लॅब कार्यान्वित होणार, दररोज दुपारी 4 वाजता माध्यमांसाठी मेडिकल बुलेटिन (वैद्यकीय निवेदन), रुग्णालयात आणि महाविद्यालयात स्वच्छतेबाबतची संस्कृती रुजविण्यासाठी अधिष्ठाताकडून करणार विशेष प्रयत्न.

·         कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न,  या पार्श्वभूमिवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती. 

·         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 28 मार्च रोजी होणारी  एमसीएची सीईटी परीक्षा 30 एपिल रोजी घेणार असल्याची  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची घोषणा.

·         नागरिकत्व सुधार अधिनियम 2019 (सी.ए.ए.), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एन.पी.आर.) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन.आर.सी.) संदर्भात गठीत केलेल्या समितीची, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित. इतर राज्यांचा अभ्यास करुन समिती अहवाल तयार करणार

·         कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून आतापर्यंत राज्यातील विविध भागात 20 छापे टाकून सुमारे दिड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती.

·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून देण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती.

·         महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2029 अंतर्गत 5000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.

·         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची, परिवहन मंत्री अॅड अनिल परब यांची  माहिती.

·         दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित, राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४८, आरोग्यमंत्री     श्री. राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रीनींग सुविधेची पाहणी.


दि. 20 मार्च, 2020

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे आवाहन :- कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज, सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही, पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील, बंदच्या बाबतीत शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी संपर्क करावा, आस्थापना, दुकाने बंद, यातील कष्टकरी कामगार कर्मचारी वर्गास किमान वेतन द्या, आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून देण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती, २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच  ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती, फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती वाढवण्याची विनंती.

·      शासनाने जाहीर केलेल्या बंदी आदेशाबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद. यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

·      कोरोना प्रतिबंधक उपचारांचा गोल्डन अवर सुरु आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. महत्वाचे मुद्दे- कोरोनाची लागण टाळण्याकरिता संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक, स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक बाबी, पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, औषध दुकाने, किराणा दुकान, भाजीपाला आदी सुरु राहील, याची खबरदारी घ्यावी, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून पुढचे टप्पे टाळण्याकरिताच काही कठोर निर्णय, मात्र त्याचा फायदा राज्याला होणार, पुढचे दहा ते पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून आवश्यक ती खबरदारी घ्या, कायदा वापरताना त्याचा जुलुम होणार नाही याची दक्षता घ्या, ज्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलता येवू शकतात, त्या पुढे ढकला, प्राथमिक तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना एन 95 मास्क द्या, एप्रिल-मे च्या काळात रक्ताची उपलब्धता कमी प्रमाणात असते, अशा परिस्थितीत पुरेसा रक्तसाठा असावा याकरिता कमीत कमी संख्या असलेले रक्तदान शिबीर घ्या.

·       नागरिकांच्या विविध शंकांना उत्तर देण्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाची चाचणी सुविधा निर्माण करण्यात येत असून त्यासाठी दररोज पाठपुरावा करा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी साथरोग नियंत्रण अंतर्गतच्या अधिसूचनेनुसार प्रभावी कार्यवाही करावी.

·       प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महत्वाचे मुद्दे- प्रधानमंत्र्यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम, वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रभावी प्रयत्न, रूग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार, तोपर्यंत 20 ते 25 हजार प्रवासी देशात-राज्यात परतणार, या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागणार, त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज, मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचे आव्हान, यावर उपाय शोधण्याची गरज,आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध, परंतु पुढील काळात क्वारंटाईनसाठी जादा सुविधांची गरज, यासाठी लष्करी रूग्णालयांची मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानमंत्री यांना विनंती.

·      गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबविण्याच्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची परिवहन विभागाला सूचना.

·      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना यातून वगळण्यात आलेआहे. यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांचा समावेश.

·      राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५२ झाल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

·      राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ. यावेळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपस्थित.

·       सिंधुदुर्ग जिल्हयातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी, यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार, परिसरातील 53 गावांतील  8हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.

·      पमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे पत्रकार परिषद- महत्वाचे मुद्दे- कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना देणारसर्व अधिकार, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्हा वार्षिक योजनेतून 5 टक्के  निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना. या परिस्थितीत आवश्यक साहित्य खरेदीचे निर्बंध वित्त विभागाकडून शिथील. रुग्णसेवेत असणा-या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडू नये, याचा विचार करुन पर्यायी डॉक्टर उपलब्ध करुन देणार, कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन देणार, या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठीचे प्रशासनाकडून नियोजन, अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालये आवश्यक त्या सुविधेसह तयार, केंद्र व राज्यशासनतसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक.

·      कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या या पार्श्वभूमिवर राज्यातील पहिली ते आठवी पर्यन्त परीक्षा रद्द करण्यात आल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा.

दि. 21मार्च, 2020

·      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरवेगवेगळ्या आरोग्यविषयक सुविधांसाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायितव निधीव्दारे अधिकाधिक मदत करावी, असे बहुजन कल्याण,मदत पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टिवार यांचे आवाहन.

·      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टिने विविध आस्थापना बंद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अशावेळी कंत्राटी तात्पुरत्याकामगारांचे वेतन कापू नये असे, मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांचे संबंधित आस्थापनांना आवाहन.

·      राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवरदहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित, अशी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा.

·      कोरोनाचे राज्यात आज एकूण 12 रूग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या 64 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Most Popular

To Top