महाराष्ट्र

वृत्तपत्रांसंदर्भात सोशल मीडियावर फिरणारा संदेश खोटा – जिल्हाधिकारी एम.डी सिंह

यवतमाळमध्ये जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

यवतमाळ, दि. 23 : प्रसारमाध्यमातून (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) कोरोना संदर्भातील खरी माहिती लोकांपर्यत पोहोचविण्यास मोठी मदत होते. कोरोना व्हायरससंबंधी वृत्तपत्राबाबत खोटा संदेश  पसरविणाऱ्याविरुध्द जिल्हा माहिती अधिकारी यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.

कार्यालयीन कामकाज करीत असताना जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जिल्हाधिकारी यांच्या सूचना’ या अंतर्गत खोटा संदेश (मेसेज) निदर्शनास आला. शिवाय या मेसेजच्या खाली जिल्हा माहिती कार्यालय असे लिहिलेले आढळले. ही बाब जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून यात वृत्तपत्रासंदर्भात खोटी माहिती असल्याचे प्रशासनाला सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करून पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार या संदर्भात शहर पोलिस स्टेशमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

वृत्तपत्रे स्वयंचलित मशीनवर तयार केली जातात. कोणत्याही मॅन्युअल टचशिवाय तसेच  ग्लोव्हज आणि फेसमास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांचे छापील गठ्ठे वाहून नेले जातात.  वाचकांच्या घरी पाठवण्यापूर्वी वृत्तपत्र डेपोमध्ये हायजीन प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाते.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरांमध्ये वस्तूंच्या वितरणामध्ये दूषित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.  अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरी वितरित केलेल्या वृत्तपत्रांचा संसर्ग होण्याचा धोका नाही.  कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच आजारपणासंबंधीची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र हे विश्वासार्ह माध्यम आहे. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्या लोकांविरुद्ध प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी एम. डी.सिंह यांनी सांगितले.

Most Popular

To Top