महाराष्ट्र

मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

मुंबई दि. 7 : राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व महसूल विभागातील किराणा व औषध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू व औषधांची आवक सुरू आहे. राज्यात कुठेही अन्नधान्य, फळभाजीपाला आणि औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती राज्य शासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची 183 वाहनातून आवक

आज नवी मुंबई वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 183 गाड्या भाजीपाला, 96 वाहनाद्वारे कांदे – बटाटे आणि  318 वाहनाद्वारे फळांची आवक झाली आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात 324 गाड्यातून भाजीपाला व फळांचा थेट पुरवठा करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 612 टेम्पू आणि छोट्या वाहनातून थेट शहराच्या विविध केंद्रावर फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.   

पुण्यात 10 हजार क्विंटल भाजीपाला व कांद्याची आवक

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपनगरातील बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विक्रीचे काम सुरळितपणे सुरु असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग  आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत.  

गुलटेकडी येथील मुख्य मार्केट यार्ड आणि मोशी, मांजरी, खडकी  येथील उपबाजार समितीमध्ये एकूण 467 वाहनामधून कांदे, बटाटे आणि भाजीपाल्याची सुमारे दहा हजार क्विंटल आवक झाली आहे.

नागपूरच्या कळमणा मार्केटमध्ये 185 ट्रक/टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक

नागपूरमधील कळमणा  येथील मुख्य मार्केट यार्डात 185 वाहनातून भाजीपाला, कांदे, बटाटे, लसून तसेच फळे यांची आवक झाली.   

राज्यातील प्रमुख शहरात भाजीपाला व फळे यांची आवक सुरळितपणे सुरु आहे,  असे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी किराणा दुकान असोसिएशन व मेडिकल असोसिएशन यांच्या संपर्कात असून किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वत्र  किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूचा पुरवठा शंभर टक्के आहे. 

Most Popular

To Top