महाराष्ट्र

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.12- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे  परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसे अन्न देण्याची हमी शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. 
या कठीण प्रसंगी आपण सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.  

या कठीण काळात सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा तुमच्यासोबत आहे. याची खात्री बाळगा. सरकार आपल्या अन्न, निवारा याची आणि आरोग्य सुविधेची पुरेशी व्यवस्था करत आहे .

केवळ आपले राज्य, आपला देश नव्हे तर संपूर्ण जगावर हे संकट आलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण गावी परतण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित वाटेतच आपणास अडविले जाईल. गावात घेतले न गेल्यास आपणावर अधिक कठीण प्रसंग ओढवेल, दुर्दैवाने साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल, म्हणून आपण आहात तिथेच राहा असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

Most Popular

To Top