महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत; संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी


‘पॅकेज’चे लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार
मुंबई, दि. 26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र व देशासमोरचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची गरज होती. या ‘पॅकेज’चे लाभ गरजूंपर्यंत पोहो‍विण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 
‘कोरोना’च्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं 1 कोटी 70 लाखांचं पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठी आहे, असं मी मानतो. यापुढच्या काळात संकट कसं वळण घेतं याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे जनतेला मदत मिळणार आहे. कोरोनाचं संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केलं असलं तरी त्याचं वितरण तात्काळ होणं अपेक्षित आहे. राज्यात व देशात इमर्जन्सी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

000

Most Popular

To Top