महाराष्ट्र

बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तातडीने करण्यात येणार – कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांकर‍िता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या नोंदीत बांधकाम कामगारांकर‍िता अटल आहार योजनेंतर्गत बांधकामाच्या ठिकाणी दुपारी 12.00 ते 02.30 या कालावधीत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येते. राज्यातील मुंबई / नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या जिल्हयातील नोंदीत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता.

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकर‍िता केंद्र व राज्य शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सदर योजनेंतर्गत बांधकाम कामगारांना भोजन वितरणाची कार्यवाही थांबविण्यात आली होती.

मुंबई / नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या शहरात बांधकामाच्या ठिकाणी अडकलेल्या बांधकाम कामगारांचा आढावा घेण्याबाबत कामगार मंत्री, दिलीप वळसे-पाटील यांनी निर्देश दिले, त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्तरावर आढावा घेण्यात आला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे बहुतांश कामगार अन्य जिल्ह्यातील अथवा उत्तर प्रदेश, बिहार अश्या परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी जाता येत नाही, अशा नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणीस अधीन राहून सर्व कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याने अशा सर्व कामगारांकरीता तातडीने मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश कामगार मंत्री, दिलीप वळसे-पाटील यांनी मंडळास दिले, त्यानुसार दि.28 मार्च 2020 रोजी नियुक्त संस्थांना मध्यान्ह भोजन वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री, दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Most Popular

To Top