महाराष्ट्र

राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोन वरून सहा दिवसांवर

  


राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या मुंबईत

     आरोग्यमंत्री राजेश टोपे



मुंबई, दि. १६: राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात अजून सहा ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा निर्माण होणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साधलेल्या संवादातील मुद्दे :

     राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता. तो नंतर तीन झाला आता सध्या सुमारे सहा दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल, तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.

     राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ टक्के मृत्यू हे रुग्णाला पूर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत.

     कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठ तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत

     राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

     राज्यात सध्या शासकीय २१ आणि खासगी १५ चाचणी प्रयोगशाळा आहेत त्यात अजून सहा प्रयोगशाळांची भर पडून ही संख्या ३६ होईल.

     पुल टेस्टींग, रॅपिड टेस्टिंगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.

     राज्यात सध्या ३०० कोरोनाबाधित बरे झले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधित रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितली आहे.

     केंद्र शासनाकडे राज्याने ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली असू त्यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत. सुमारे ३० हजार पीपीई किट उपलब्ध झाले आहेत.

     दिल्ली येथे मरकजसाठी राज्यातील जे तबलिगी बांधव गेले होते त्यातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

     अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथिलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील, त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिलनंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

०००००

अजय जाधव..१६.४.२०२०

Most Popular

To Top