नवी दिल्ली – भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या काही पत्रांनी खळबळ उडवून दिली असून यूपीए सरकारच्या काळातील पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी माल्ल्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा उल्लेख या पत्रांमध्ये आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
या दाव्यानुसार माल्ल्या यांनी बँकांच्या समूहाकडून कर्ज मिळविण्यासाठी मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांच्याशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, चिदंबरम यांना २१ मार्च २०१३ आणि मनमोहन यांना ४ ऑक्टोबर २०११ रोजी माल्ल्यांकडून पत्र लिहण्यात आले होते. माल्ल्या यांनी या पत्रात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) प्रमुखांशी भेट घडवून आणावी, यासाठी चिदंबरम यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, चिदंबरम यांनी माल्ल्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.
भाजपने ही पत्रे उघडकीस आल्यानंतर मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांच्याविरूद्ध टीकेची झोड उठवली असून या दोघांनीही माल्ल्यांना पाठिशी घातल्याचे आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी काम केल्याचा आरोप केला. हा सगळा पत्रव्यवहार उघड झाल्यानंतर काहीवेळातच भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे पितळ उघडे पडल्याचा दावा केला. विजय माल्ल्या यांना २००४ मध्ये पहिल्यांदा कर्ज मंजुर करण्यात आले होते, त्यानंतर २००८ मध्येही त्यांना कर्ज देण्यात आले.
