व्यक्ती विशेष

गोपीनाथ मुंडे जीवनचरित्र

गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
गोपीनाथ मुंडे

खासदार
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील जयसिंगराव गायकवाड पाटील
पुढील विद्यमान
मतदारसंघ बीड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
कार्यकाळ
इ.स. १९९५, १४ मार्च – इ.स. १९९९

विधानसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९८० ते इ.स. १९८५, इ.स. १९९० ते इ.स. २००९

जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४९
गाव. नाथ्रा, ता. परळी, जि. बीड, महाराष्ट्र
मृत्यू जून ३, इ.स. २०१४
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी प्रज्ञा मुंडे (महाजन)
अपत्ये पंकजा पालवे मुंडे, प्रीतम मते-मुंडे, यशश्री मुंडे
निवास शुभदा बिल्डिंग, आर.टी.ओ समोर, सर पोचखानवाला मार्ग, वरळी सी फेस, मुंबई- ३०
धर्म हिंदू
Editor Dnyaneshwar bade

गोपीनाथ पांडुरंग मुंडे (१२ डिसेंबर १९४९ – ३ जून २०१४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य असून त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.

१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनपाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जातात. त्यांना भाजपमधील ग्रासरूट लेव्हलला काम करणारा नेता असे म्हटले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होतीे.

गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. . संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.

 

लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला, असे समजले जाते. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश आणि जीवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला. या संघर्षमय पार्श्‍वभूमीमुळे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मुंबईत गेले. या बळावरच ते राष्ट्रीय नेतेपदापर्यंत पोहोचले. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत गोपीनाथ मुंडे यांना आपले विचार मांडायची संधी, त्यांच्या एकसष्टीच्या पूर्वसंध्येला मिळाली. भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला आहे.

रूढार्थाने महाराष्ट्राची भूमी भाजप चळवळीस फारशी अनुकूल नसताना राज्यात भाजपचा झेंडा सातत्याने फडकवीत ठेवणारे आणि एकूणच सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हा भाजप चळवळीस जनसमर्थनासाठी झुंजत होता. राजकीयदृष्ट्या अपृश्‍य समजल्या जाणाऱ्या भाजपला जनाधार मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. याच आव्हानाचा पाठलाग करताना आणि थेट देशाच्या राजधानीत बस्तान मांडले आणि आता तर भारताच्या सीमा ओलांडून ते संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पोहोचले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र गोपीनाथ मुंडे उभे होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सुप्रतिष्ठित व्यासपीठावर आपले विचार मांडायची संधी त्यांना मिळाली. एकसष्टीच्या पूर्वसंध्येला ही संधी देऊन महाराष्ट्राच्या मराठवाड्यासारख्या एका मागासलेल्या प्रदेशातल्या, बीड जिल्ह्यातल्या, परळी तालुक्यातल्या नाथ्रा गावातल्या गोपीनाथ मुंडे नावाच्या नेत्याचा भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला.

अनुक्रमणिका

  • व्यक्तिगत आयुष्य
  • विद्यार्थी जीवन
  • राजकीय कारकिर्द
  • राजकीय कर्तृत्व
  • संघर्ष प्रतिमा
  • राजकीय सिद्धांत
  • संक्षिप्त परिचय
  • संदर्भ आणि नोंदी
  • बाह्य दुवे

व्यक्तिगत आयुष्य

गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर, इ.स. १९४९ रोजी वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडेंच्या प्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या आध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडील भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेंच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला.

त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. इ.स. १९६९ मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, इ.स. १९७८ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले.गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत. [२३]

विद्यार्थी जीवन

गोपीनाथ मुंडे यांचे आरंभीचे शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे झाले. [१५] गोपीनाथ मुंडे इ.स. १९६९ मध्ये आंबेजोगाई येथील योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात होते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले. मुंडे पदवीचे शिक्षण घेत असताना बी. के. सबनीस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सबनीस सर हे समाजवादी विचारांचे होते. त्यांचे विद्यार्थी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. मुंडे यांना सबनीसांचा आदर होता. संघाच्या विचारांचा प्रभाव असूनही मुंडे यांनी इतर मतांबद्दल दुराग्रह ठेवला नाही. [१०]

मुंडेंनी चार दशकांपूर्वी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा श्रीगणेशा केला. कॉलेजात असतांना त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि मुख्य म्हणजे कुठलेही आथिर्क पाठबळ नसताना मुंडेंनी कॉलेजच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची म्हणजे ‘सीआर’ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा राजकारणाचा पहिला अनुभव होता. गोपीनाथराव निवडणुकीत पडले, पण त्यांचा गट निवडून आला होता. बीड जिल्ह्यातल्या कॉलेज निवडणुकांवर प्रदीर्घ काळ वर्चस्व गाजवणाऱ्या एका ग्रुपला पाणी पाजण्यात मुंडे-महाजन गटाच्या मसलती यशस्वी ठरल्या होत्या. युतीच्या राजकारणाची ओळख समाजाला झाली आणि युतीच्या राजकारणाचे बीज पेरले गेले. गोपीनाथराव कॉलेजमधली पहिलीवहिली निवडणूक हरले; पण त्यामुळे त्यांच्या पुढच्या चळवळीच्या आणि आंदोलनांच्या राजकारणाला जशी कुठेच बाधा आली नाही. तशीच पुढच्या दहा वर्षांतच लढवलेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतरही त्यांच्या राजकारणाचा वारू कोणी रोखू शकले नाही. दरम्यानच्या काळात श्रीपती शास्त्री यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून गोपीनाथरावांना तावून -सुलाखून बाहेर काढले होते. त्याच काळात गोपीनाथरावांनी अखिल भारतीय विद्यार्थी चळवळीचा ओनामा जाणून घेतला होता. पुढे देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातही मराठवाड्यात गोपीनाथराव, प्रमोद महाजन सातत्याने कार्यरत होते. [१६]

राजकीय कारकिर्द

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. [२४] जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषत: मतदारसंघावर असायचे. [९] वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली बीडजिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. [१५]

१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.[३]

मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. जिल्हापरिषदेच्या स्थानिक स्तरावरील राजकारणाशी त्यांचा फारच थोडा काळ संबंध आला. पण तेथे गिरवलेले धडेच त्यांना पुढे विधानसभा गाजवताना कामास आले. देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातही मराठवाड्यात मुंडे-महाजन सातत्याने कार्यरत होते. त्यामुळेच आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पहिल्या विधानसभेची उमेदवारी त्यांना इ.स. १९७८ मध्ये मिळाली होती. तिथे नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. [१६] त्यावेळी काँग्रेस (इंदिरा) पक्षाचे १२ आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पडले. १८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार यांच्याशी भाजपने युती केली आणि ‘पुलोद’चं सरकार आलं. [२५] इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली आणि पुन्हा निवडणुका लागल्या. दोन वर्षांत आयती चालून आलेली संधी मात्र गोपीनाथरावांनी हातची निसटू दिली नाही. इ.स. १९८० सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत मुंडे आमदार म्हणून निवडून आले. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नाथ्रा गावातला एक युवक थेट राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन पोचला होता. केवळ आपल्या गावाचाच आवाज त्याला या सभागृहात पोचवायचा नव्हता तरमराठवाड्यासारख्या मागास भागातील दीनदुबळ्यांची दु:खे आणि व्यथा-वेदना त्याला तेथे पोचवायच्या होत्या. गोपीनाथरावांनी ते काम मोठ्या तडफेने पार पाडले आणि आमदारकीची धुरा सांभाळत असतानाच महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस म्हणून संघटनेचीही सूत्रं सांभाळली. [१६] जनसंघ ते भाजप अशी प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची वाटचाल झाली. बीड मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी भाजपसाठी प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले.

पण पुढे दोन-अडीच वर्षांतच ‘जनता पार्टी’ फुटली आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) नावाचा नवा पक्ष जन्माला आला. या नव्या पक्षाकडे आपल्या युवक संघटनेची म्हणजेच ‘भारतीय जनता युवा मोर्च्या’च्या कारभाराची सूत्रे सोपवण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे’ हा आदर्श पर्याय उभाच होता. [१६] वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे काम विस्तारत होते. [१५] पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. इ.स. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा जनरल सेक्रेटरी झाले.इ.स. १९८० साली बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही. ‘गोपीनाथ मुंडे’ हे नाव आता साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक झाले होते. बहुधा त्यामुळेच इ.स. १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत गोपीनाथरावांचे सारे विरोधक एकत्र झाले आणि त्याची परिणती त्यांच्या पराभवात झाली. पण पराभवाने खचून जाण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी जिद्दीने पक्ष वाढवण्याचं काम हाती घेतलं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे इ.स. १९८६मध्ये महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पक्षाचे एक अर्ध्वयू आणि मावळते अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी कौल दिला : ‘माझ्या गादीवर मुंडेच बसतील!’. ते अपयशाने खचले नाही. या दरम्यान त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित होत गेले. सातत्याने त्यांनी लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसताना अनेक प्रश्‍न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्षाच्या भिंती तोडून तयार केला. सर्व समाजातील मतदारांनी त्यांना स्वीकारले.  म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच भाजपच्या वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आंदोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला. या साऱ्या प्रवासात राजकीय गुरू वसंतराव भागवत होते. वसंतरावांनी तेव्हा लिहिलेले एक पत्र आजही गोपीनाथरावांच्या स्मरणात आहे. भागवतांनी त्या पत्रात अनेक मौलिक सूचना केल्या होत्या. त्यातील एक होती : ‘दौऱ्यावर कधीही हॉटेलात उतरायचे नाही, तर कार्यकर्त्याच्या घरीच मुक्काम करायचा…’ मुंडे हाताखालचे सरचिटणीसपद तेव्हा भागवत यांनी जाणीवपूर्वक स्वीकारले होते. याच पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र भाजपचा चेहरामोहराच नव्हे तर स्वभावही बदलून टाकण्याचे काम मुंडे यांनी केले. त्यात धरमचंद चोरडिया यांच्यासारख्या उदारमतवादी कार्यकत्यांची त्यांना भक्कम साथ लाभली. धरम चोरडीया (मारवाडी), अण्णा डांगे (धनगर), मुंडे (वंजारी), ना. स. फरांदे (माळी) हे एकत्र आले. या सर्वांनी (माधवं) समाजाच्या तळागाळातील उपेक्षित वर्गांपर्यंत भाजपला पोहोचवण्याचे मोठे काम केले. [१६] ब्राह्मणी चेह-याच्या भाजपला मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. आपण ओबीसी हा प्रभावशाली घटक जवळ करणे आवश्यक आहे हे वसंतराव भागवत वगैरेंनी जाणले. महाजनांच्या जोडीला मुंडेंना पुढे आणण्यात आले आणि मुंडे यांनी त्यांचा विश्वास सार्थ करून भाजपचा राजकीय पाया घातला.

इ.स. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे थोडेथोडके नव्हे तर ४२ आमदार निवडून आले! हे श्रेय अर्थातच गोपीनाथरावांच्या दूरदृष्टीचं होते. [१६] इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला. [२७] विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली. [१५] गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मंडल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले. [२५]मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन संपूर्ण राज्यभर दौरा करीतशरद पवार यांच्याविरोधात रान उठविले होते. [२७] जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झाले. जळगावमधलं सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतरच केस होऊ शकली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला. शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा शब्दप्रयोगही तेव्हाच अस्तित्वात आला. शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय नेहमीच लोकांसमोर मांडला. त्यामुळे गोवारींचं हत्याकांड असो, वडराई प्रकरण असो, केवळ मुंडे यांनी त्याबाबत आवाज उठवल्यामुळेच ही प्रकरणं लोकांसमोर आली. त्यावर कारवाईही झाली [२५][२८] ‘राजकारणाचं गुन्हेगारीकरण’ हा मुद्दा त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेला. [१६] त्यावेळी गोपीनाथजीनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी काढलेली संघर्ष यात्रा प्रचंड गाजली. महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेसेतर राजकीय शक्ती सत्तेत येण्याचा चमत्कार नव्या समीकरणात इ.स. १९९५ साली घडला. इ.स. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून शिवसेना आणि भाजप युतीने राज्याची सत्ता खेचून घेतली. [१५] फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता. [२९] याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.१९९०च्या दशकांत मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स. १९९५ साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला. [२७]

विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली. [२७] गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्‍न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पध्दतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी संपर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत. हे उपमुख्यमंत्रिपद सर्वार्थाने गाजवले आणि युतीचे सरकार गेल्यावरही ते जिद्दीने काम करत राहिले.

इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्तानेभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. मुख्य म्हणजे गोपीनाथरावांचे जे जे कट्टर विरोधक होते त्यांच्या घरी जाऊन ‘काका मी आता आलीय’ असे सांगून अनेक ठिकाणी कटुता मिटविण्याचा प्रयत्न केला. बीडमधील मतदार पंकजालाच गोपीनाथरावांची राजकीय वारस मानू लागले. गोपीनाथरावांच्या यशात ‘वुमन ऑफ द मॅच’ म्हणून पंकजा पालवेचा उल्लेख केलाच पाहिजे. [१] महाराष्ट्र गाजवणारा नेता राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचला होता. [१६]

भाजपने खासदार गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राचे भाजप प्रभारी म्हणून नेमणूक ११ जूलै, इ.स. २००९ रोजी केली आहे. [३०] महाराष्ट्रात इ.स. २०१४ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची धुरा लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरच सोपविण्याचा निर्णय आरएसएस आणि भाजप बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मुंडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी घेतील. [३१]

महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या 35-40 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झालेला हा नेता देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष उपनेता या पदावर यशस्वीपणे काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असूनही त्यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकत्र्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर सर्व साथींना त्यांनी आधार दिला. प्रमोद महाजन यांचे सच्चे साथी गोपीनाथ मुंडे हे दोघेही बीड जिल्ह्यातील होते तरीसुद्धा ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडातून निवडणूक लढवली होती. आरएसएसच्या मुशीत घडलेले साखर कामगारांचे लढवय्ये आणि चळवळीचे नेते गोपीनाथ मुंडे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला साथी गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे म्हणजे चळवळीचा अखंड स्नेत होता. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची प्रमोद महाजन यांच्यावर अपार निष्ठा होती. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार- खासदार होऊन परंतु सत्तेच्या बाहेर राहून साखर कामगारांसाठी प्रचंड योगदान दिले. स्वातंर्त्योत्तर काळापासून साथी गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसले होते. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली पन्नास वर्षे त्यांनी या कामगारांचे अव्याहतपणे नेतृत्व केले. साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कामगारांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी साखरसम्राटांशी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले. ते अखेरपर्यंत त्यांच्या विचारावर ठाम राहिले. अग्रभागी असायचे. कामगारांचे नेते अशीच त्यांची कायम ओळख राहिली. गोपीनाथ मुंडे अखंड कार्यरत असायचे.

संसदीय लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर विरोधी पक्षनेता हा अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू असण्याची गरज आहे. ते सर्व गुण गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये असल्यामुळेच आजवर अनेक प्रश्नांना चांगला न्याय मिळाला. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या वाटय़ाला नेहमी दुय्यम भूमिका आली असल्यामुळे राजकारणात त्यांच्या नेतृत्व वाढीला मर्यादा पडल्या असल्या तरी त्यांनी सतत आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शरद पवारांप्रमाणे पक्ष बदल करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना मोठे होता आले असते; पण प्रत्येक वेळी आलेली संधी डावलून त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली. नारायण राणे यांच्याप्रमाणे मुंडे यांनाही कॉँग्रेस पक्षाने अनेकदा खेचून घेण्याचे प्रयत्न केले. मोठमोठय़ा पदांचे गाजर त्यांना दाखवले. पण मुंडेंनी पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व दिले. भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांपेक्षा किंचतही अनेक नेत्यांपेक्षा व्यक्तिमत्त्वामध्ये कसलीही कमतरता नसताना सर्वोच्च पदाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळू शकला नाही. तुलनेत लहान असलेले नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले, तरी देखील त्यांच्या हाताखाली काम करणे मुंडेंनी कमीपणाचे मानले नाही. अगदी अलीकडे त्यांच्या घरातूनच बंडखोरी झाली, तरीदेखील ते डगमगले नाहीत आणि त्यांनी आपले काम सुरू ठेवले. प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता. त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल, असे त्यांच्या विरोधकांना वाटत होते; परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. त्यांचे सख्खे मोठे भाऊ पंडितअण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिह्यातील सर्व पदे त्यांनी मिळवून दिली. पंडितअण्णा मुंडे तसेच धनंजय यांनी देखील जिल्हापरिषद अध्यक्षपद, साखर कारखान्यांचे चेअरमनपद, जिल्हा बॅँकेचे चेअरमनपद अशी अनेक मोठी पदे भूषवली. धनंजय मुंडे यांना तर त्यांनी विधान परिषदेवर आमदार केले, तरी देखील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी पक्षांतर्गत नव्हती तर प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध दंड थोपटून त्यांनी बंड केले; पण मुंडे विचलित झाले नाहीत. या परिस्थितीवरही त्यांनी मात केली आणि आपले कार्य सुरू ठेवले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम केले. तत्कालीन कॉँग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर जे रान उठवले, त्याला सीमा नव्हती. राज्यभर संघर्ष यात्रा काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातवरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. त्या वेळी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी राजकारणात गुन्हेगारीकरण होत असल्याचे घणाघाती आरोप सुरू केले होते. वातावरण निर्मिती होऊ लागली होती. हा विरोध वाढवण्याचे यशस्वी काम ठाकरे-मुंडे यांनी केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपुमख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. शिवसेनेने मात्र त्यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचे राजकारण केल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, तरीदेखील गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईतील टोळीयुद्ध नष्ट केले. गुंड टोळय़ांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना दाबून टाकण्याची एकही संधी सोडली नाही; परंतु त्यांनी सरकारवरचा आपला प्रभाव कायम ठेवला. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर हल्लाबोल करून त्यांनी युतीची सत्ता मिळवली होती, हे विशेष. विधानसभेत केवळ दोन-पाच जागा मिळवणाऱ्या भाजपाला बेरजेचे राजकारण करून त्यांनी 56 वर नेऊन ठेवले. युतीच्या राजकारणात भाजपाने शिवसेनेला महत्त्व देऊन कायम दुय्यम भूमिका स्वीकारल्यामुळे मुंडेंची फार मोठी कोंडी झाली. सर्वगुणसंपन्न नेतृत्व असूनही शरद पवारांएवढी झेप घेणे मुंडेंना शक्य झाले नाही. तसे पाहिले तर भाजपाच्या राजकारणामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व काहीसे संकुचित झाले. राजकारणातील चढउतारांचा सतत अनुभव घेणाऱ्या मुंडेंमधील नेतृत्व गुणांचे खऱ्या अर्थाने चिज झाले नाही. मुंडे यांची अनेकदा शरद पवारांशी तुलना झाली; पण भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना पवारांशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकली नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात गेले, तेव्हा महाराराष्ट्रातील पवारांची पोकळी भरून काढणे मुंडेंना शक्य झाले नाही. उलट भाजपाने त्यांना केंद्रातच पाठवून दिले आणि आपल्या पक्षातच नेतृत्वाची पोकळी निर्माण करून टाकली. मात्र मुंडेंनी केवळ राजकारणच केले नाही, तर विधायक कामातही ते सरस ठरले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खाजगी साखर कारखानेही त्यांनी काढले आणि यशस्वीरीत्या चालवूनही दाखवले आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मराठवाडय़ातील प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच भाग घेतला होता. मराठवाडय़ाच्या हितासाठी मित्रपक्ष शिवसेनेवरही त्यांनी हल्ला केला होता; परंतु प्रमोद महाजनांनंतर शिवसेनेशी युती कायम ठेवण्यासाठी त्यांनीच मध्यस्थाची भूमिकाही स्वीकारली होती. युतीच्या राजकारणात जे काम महाजन करतअसत ते मुंडेंनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते. राजकीय प्रगल्भता दाखवण्याबरोबरच विधायक कामावर भर दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि राजकारणातील प्रभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आपोआपच बनली आहे. [३२]

यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पिढी उभी राहत असताना महाराष्ट्राला प्रमोद महाजनांचा धक्का बसला. महाजनांची पोकळी भरू पाहणार्या विलासरावांना नियतीने नेले. पाठोपाठ मराठी माणसांचा आधारवड बाळासाहेबदेखील कोसळले. आता आशा उरते ती फक्त एका माणसांवर आणि ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेचे योगदान महत्त्वाचे आहे. किंबहुना पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्ती गोपीनाथ मुंडेच्यामध्ये आहे. धर्म-जात-पंथ-प्रदेश या सगळय़ा मर्यादांपलीकडे गोपीनाथ मुंडेचा विचार होऊ शकतो. गोपीनाथ मुंडेच्या पंतप्रधान होण्यासाठी मराठी माणसांच्या एकत्रिकरणाची आवश्यकता आहे. पक्ष भलेही वेगळे असू द्या पण गोपीनाथ मुंडे पंतप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राची पॉवर केंद्रात दिसायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिल्लीने नेहमीच वेसण घातली आहे आणि दिल्लीकरांच्या कारवायांचा नियतीनेही साथ दिली आहे. ज्या वेळी महाराष्ट्राचे नेतृत्व देशभरात प्रभावित व्हायला लागेल त्या त्या वेळी दिल्ली ते नेतृत्व संपविले आहे. हा कडू पण सत्य इतिहास मान्यच करायला हवा. सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण ही दिल्ली दरबाराच्या राजकारणामुळे मागे राहिलेली नावे. खरंतर या तिघांमध्ये देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता होती आणि वारंवार ते काळाच्या कसोटीवर सिध्दही झाले आहे; पण भारताच्या राजकारणात महाराष्ट्र मागे राहिला किंवा मागे ठेवला गेला. 1950 आणि 1960 च्या शतकातील राजकारण्यांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही आशा निर्माण झाल्या होत्या. शंकरराव चव्हाणांचे वर्चस्व वाढत होते आणि शंकररावदेखील महाराष्ट्रातले नेतृत्व घडवत होते. हेड मास्तर अशी उपाधी मिळालेले शंकरराव दिल्लीत गेल्यावर पंतप्रधानपदापर्यंत मजल मारतील, अशी अंधूकशी आशा महाराष्ट्राला होती; पण राजकीय जोडातोडीत हे शक्य झाले नाही. त्यामुळे मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहावयास मिळालाच नाही.

शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदापर्यंत वेगाने घोडदौड करीत होते. अटलजींच्या नंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पंतप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.

महाराष्ट्रातील महाजनांनंतरचा दुसरा नेता म्हणजे विलासराव देशमुख. राजकारणातील राजहंसच. वयाच्या सत्तरीच्या दशकात तरुणाला लाजवील असा उत्साह होता. राजबिंड रूप, प्रभावी वक्तृत्व तेवढच प्रभावी कर्तृत्व. लोकसंचय या जोरावर विलासराव भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात, असे लोकांना वाटायचे; पण पुन्हा एकदा नियतीने महाराष्ट्राचा घात केला. चार दशके संघर्ष करून उभे राहिलेले नेतृत्व निघून गेले. बाळासाहेब ठाकरे हे देशाला पंतप्रधान देऊ शकतील, असे एक नाव. ज्यांच्यामुळे मराठी राष्ट्रपती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकले ती व्यक्ती एखादा मराठी पंतप्रधान होण्यासाठी बिनधास्तपणे पुढे आली असती. बाळासाहेबांचे शरदबाबू पंतप्रधानपदाच्या जवळपास गेले असते तर बाळासाहेबांनी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन पंतप्रधान बनण्याची संधी दिली असती; पण मराठी माणसाचे हित बघणारा हा दिलदार माणूसही नियतीने हिरावून नेला.

गोपीनाथ मुंडेचे नेतृत्व हे साडेचार दशक राजकारणात घातल्यानंतर उभे राहिलेले आहे. आज मुंडे ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर जायला प्रत्येक नेत्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. किंबहुना ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी एक मोठा काळ जावा लागतो. देशाला स्वातंर्त्य मिळून अजून सत्तर वर्षे काळात महाराष्ट्रातून फक्त पाच नावे गेलीत जी पंतप्रधान पदाच्या जवळपर्यंत पोहोचत होती. ही वास्तविकता लक्षात घ्यायला हवी. गोपीनाथ मुंडेचा कौतुक करण्यासाठी नाही तर अर्धे आयुष्य राजकारणात घातल्यानंतर या प्रदेशाची अस्मिता देशपातळीवर चमकली आणि त्यासाठी याच प्रदेशातून प्रयत्न झाले आहे. नेतृत्व सहज घडत नाही

गोपीनाथ मुंडेच्या भूमिका, विचारधारा आणि कार्यपध्दती यावर अनेक वाद असू शकतील. कोणी त्याला बरोबर म्हणेल तर कोणी चूकही म्हणेल. पण गोपीनाथ मुंडेची राजकारणातील तपश्चर्या, अनुभव आणि त्यांचे मराठी असणे हे वादाच्या पलीकडचे आहे. मुंडेची जी भूमिका वेळी घेतली होती. तीच भूमिका महाराष्ट्रातील राजकारण्यांना किमान पक्षी निवडणुकीच्या नंतर तरी घ्यावी लागेल.

गोपीनाथ मुंडेच्या विषयात याच भूमिकेचा जागर होण्याची गरज आहे. गोपीनाथ मुंडे कोणाचे? या मुद्यापेक्षा ते महाराष्ट्राचे आहेत हा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा ठरला पाहिजे. जशी महाराष्ट्राची मानसिकता बनायला हवी तशी महाराष्ट्राचा नेता होण्याची प्रबळ इच्छा गोपीनाथ मुंडेचीही बनायला हवी. किंबहुना त्यांच्या वाटचाली याच अंगाने घडायला हव्यात, असे महाराष्ट्राचे मन सांगते. सध्या तरी महाराष्ट्राचा नेता विकसित होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. दिल्ली दरबारी राज्याचे वजन राखले गेले पाहिजे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेची काय इच्छा आहे या प्रश्नाचा विचार नंतर करू . पण महाराष्ट्राची इच्छा, किंबहुना गरज गोपीनाथ मुंडेनी मोठे होणे ही आहे. राज्यातून केंद्रात प्रभाव टाकू शकेल असे एकमेव नाव गोपीनाथ मुंडे आहे आणि तेवढीच एक महाराष्ट्राची आशा आहे आणि ही आशा प्रज्वलित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दम असलेली काही मोजकी मंडळी आहेत. उभा महाराष्ट्र याच नेत्यांकडे आशेने बघतो आहे. त्यापैकी एक गोपीनाथ मुंडे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकिर्द झळाळून आली आणि आजही या योद्धय़ाची संघर्षयात्रा सुरू आहे. युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही मुंडे एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिलेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा सगळय़ाच पातळीवर राहिला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला. भाजपाच्या आंदोलनात काठय़ाही खाल्ल्या. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे अनेकवेळा खच्चीकरणाचे प्रयत्नही झाले. पुढे-पुढे हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरदेखील उतरला; पण या सगळय़ांना टक्कर देत मुंडे उभेच आहेत . सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षांतर करण्याइतके ते तकलादू नेते बनले नाहीत. क्षणिक लाभासाठी त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. भारतीय जनता पार्टीत जन्मलेले मुंडे, भारतीय जनता पार्टीशीच प्रामािणक राहिले आणि आपल्या ताकदीवर भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात एकदा सत्ता मिळाली आणि राज्यातील विविध सत्ताकेंद्रावर मुंडेंनी आपला ताबा कायम ठेवला आहे. कितीही संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली वाटचाल तशीच ठेवलेली आहे. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडेच पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात चालणार्या वैद्यनाथ साखर कारखान्याने सगळेच उच्चांक मोडीत काढले. ज्या बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारी मोडीत निघत होती, त्याच जिल्ह्यात पूर्णत नफ्यात आणि कमी खर्चात हा साखर कारखाना चालवून दाखविला. एवढंच नाहीतर साखरेला ब्रँडचे रूप दिले. सहकारी साखर कारखानदारीसोबत खासगी साखर कारखान्यांमध्येही मुंडेंनी आपला वेगळा वरचष्मा कायम राखला आहे. पानगावचा पन्नगेश्वर, लिंबा गावचा योगेश्वरी, अशी या परिसरात खासगी तत्त्वावरील कारखानेदेखील उत्तमरीतीने चालविले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने एक-दोन साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालवायलादेखील घेतले आहे. हे त्यांच्या साखर कारखानदारीचे यश आहे. आज राजकारणात दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे मुंडेंचा करिष्मा संपला, अशी चर्चादेखील चालू आहे. पण मुंडे संपणार्यांपैकी नाहीत एवढे मात्र नक्की. मुळात जे नेतृत्व संघर्षातून, कष्टातून उभे राहिले आहे, ते असे सहजासहजी संपणे शक्य नाही. मुळात मुंडेंसारख्या संघर्षशील नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. विशेष करून मराठवाडय़ाला. आज ज्या स्थितीत महाराष्ट्राची आहे त्या स्थितीत नेतृत्वाची एक मोठी पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद फक्त गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये आहे. आवश्यकता आहे ती मुंडेंनी आता सिंघम बनून समोर येण्याची. त्यांनीच आता महाराष्ट्राची भल्यासाठी सिंघम बनणे आवश्यक झाले आहे. [३३]

राजकीय कर्तृत्व

युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय : वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न. गरिबांना स्वस्त खाणे मिळण्यासाठी झुणका – भाकर केंद्र योजना. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना. गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच झुणका – भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते. कुटुंबप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना. बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये. शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना. मुंबईत ५५ उड्डाणपुलांची योजना. युतीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना राबवली होती. याच वाटेवरून रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला. कृष्णा खोरे विकास मंडळ स्थापन करून कृष्णा खोरे प्रकल्पाला खुल्या बाजारातून पैसा उभा केला. पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी पन्नास टक्के एस.टी. प्रवासात सुट दिली होती. शिवाय देहू, आळंदी व पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी धर्तीवर विकास कामासाठी करोडो रूपये दिल्या [ अपूर्ण वाक्य] [३४]

भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकिर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटंना सामोरे जावे लागले, त्यांची कारकिर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ताण मांडून बसली आहे. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी असते. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुंडांना कंठस्नान घातले. पोलिस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. [१४] भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. [३५] भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुंबईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरु झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’, परिणामी मुंबईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी संताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत. एक नेता म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये अयशस्वी ठरलेले साखरकारखाने स्वतः चालवायला घेतले व हे नव्याने सुरू केलेले कारखाने आजही यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहेत. राज्यात साखर कारखनदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉँग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पदकंणा जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले आहे [१५]

गोपीनाथ मुंडे…ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्त्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल १२ साखर कारखाने आहेत तर १२ पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता आहे. मात्र संधी मिळेल तेव्हा याच ऊसतोड कामगारांनासोबत घेऊन मुंडे साखर सम्राटांना शह देतात. [३६] राज्यात मुंडेंऩी २६ साखर कारखाने उभे केलेले आहेत. तसेच राज्यातील एकूण कारखान्यांपैकी पन्नास ते साठ कारखाने मुंडेंसमर्थकाकडे आहेत. [३७]

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबईतील उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अवसायानात गेलेले साखर कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प असे नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभारल्या आहेत. [२७]

भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या काळात इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडांदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पैठणचे सुपुत्र व इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. [३८]

मुंडे यांनी युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्री असताना करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे व उजनीच्या दहिगाव सिंचन योजनेचे काम मंजूर केले. [३९]

भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रोझोन मॉलवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चार मजली ‘प्रोझोन ट्रेड सेंटर’ चा पाया रचला. [४०]

व्हीनस कल्चरलतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘संत ज्ञानेश्‍वर’ पुरस्कार त्या वर्षी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला; गोरेगाव येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला. खेबुडकरांच्या कन्या कविता पडळीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तेव्हा कोल्हापुरात असलेले खेबुडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. पुरस्काराबद्दल कळविल्यानंतर खेबुडकरांनी हा सन्मान गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे व्हीनस कल्चरलतर्फे रमेश मेढेकर यांनी सांगितले होते. [४१]

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू : २०११-१२ मध्ये भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. या कामाची मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. [४२] भाजपचे उपनेते बीड जिल्ह्याचे खा.गोपीनाथ मुंडे हे संसदेत या मार्गासाठी चांगली तरतुद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या सगळ्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला चालना मिळेल आणि हा रेल्वेचा प्रश्न मागीर् लागण्यासाठी मदत होणार आहे. [४३] मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडं ६०० कोटी रूपयाची मागणी केली आहे. या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दलमराठवाडा जनता विकास परिषदेने त्यांचे अभिनंदन केले आहे. मराठवाड्यातील खासदार रेल्वेच्या प्रश्नाकडं लक्ष देत नाहीत पण मुंडेंनी हा प्रश्न लावून धरला असं परिषद सांगते. [४४]

गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे केवळ जनसंघ नाही, तर या परिवाराच्या परिघापलीकडे जाऊन त्यांनी अनेक माणसे आणि गट आपल्याशी घट्टपणे जोडून ठेवले आहेत. मुख्य म्हणजे इतर मागासवर्गीय समाज हा त्यांच्यासोबत उभा आहे. इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातीच्या आधाराने व्हावी, ही मागणी मुंडे यांनी संघाचा विरोध असतानाही लावून धरली आणि ती प्रत्यक्षातही आली. त्यामुळे मुंडे भाजपत राहिल्यामुळे केवळ भाजपच नव्हे तर युती वाचली. [९]

खासगी क्षेत्रात ओबीसींच्या आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत असा नाराही मुंडेनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचंही मुंडेनी सांगितलं. [४५]

मंडल आयोगाच्या वेळी देशभरातील भाजप आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना मंडलच्या विरोधात असताना मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र भाजपने मंडलला समर्थनाची भूमिका घेतली होती. [४६]

ओबीसी मुस्लिमांना आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका मुंडेनी घेतली होती. त्यांनी ओबीसी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी मुस्लिम परिषदेत केली होती. [४७]

बीड येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत अशी घोषणा केली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही असे आश्वासन दिले आहे. [४८]

अंबाजोगाईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्‍वरी देवीचे चोरी गेलेले दागिने लोकनिधीतून पुन्हा तयार करण्यासाठी शहरवासीयांची खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली. [४९]

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान मठ संस्थान खळेगांवचे मठाधिपती ष.ब्र.१०८ त्यागमूर्ती भावलिंग शिवाचार्य महाराज, खळेगांवकर यांच्या वयाला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल गेवराई येथे चिंतेश्वर मंदिरामध्ये त्यांचा एकादश शतकोत्सव व गुरुवंदना सोहळा दि. ११ एप्रिल रविवार रोजी साजरा झाला. या कार्यक्रमास लोकलेखा समितीचे अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. [५०]

पाटखळ माथा (वाढे, ता. सातारा) येथील ॐ श्री सद्‌गुरु गजानन महाराज ट्रस्टच्या ध्यानमंदिराचे उद्‌घाटन व श्री सद्‌गुरु गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना रविवारी लोकसभेतील भाजपचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. खा. मुंडे म्हणाले, ट्रस्टच्या ध्यानमंदिराची प्राथमिक उभारणी झाली असून त्याच्यावर मोठे राममंदिर उभारायचे आहे. आधी केले पाहिजे मग इतरांना करायला सांगितले पाहिजे, याप्रमाणे आधी मी ध्यानमंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टला मदत केली आहे. यापुढेही सतत मदत करत राहणार आहे परंतु स्थानिक सर्वांनीच या पवित्र कामासाठी मदत केली पाहिजे. शेगाव येथे गजानन महाराजांचे मोठे मंदिर आहे परंतु या ट्रस्टमुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. ध्यानमंदिराच्या उभारणीमुळे ट्रस्ट व माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. आता या ठिकाणी राम मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणार आहे. भारतीय संस्कृती जगात सर्वात मोठी आणि आदर्श संस्कृती आहे. साईबाबा आणि गजानन महाराज यांची भक्ती खूप मोठी होती. भक्तीमध्ये खूप शक्ती असते. संतांच्या सहवासातून ईश्वराचा आशीवार्द प्राप्त होऊ शकतो, असे मत भाजपचे नेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले. [५१]

पुण्यात मात्र अनावश्‍यक वाद उकरून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न होत आहे. दादोजी कोंडदेव प्रातः स्मरणीय असून, कोणीही नवा वाद निर्माण करून शहराचे वातावरण गढूळ करू नये आणि महापुरुषांची बदनामी थांबवावी असे विचार भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले [५२]

बीड जिल्ह्य़ात इ.स. १९७२ पेक्षा भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचा समावेश केला नाही. पश्चिम महाराष्ट्राला तुपाशी खाऊ घालणाऱ्या व दुष्काळी परिस्थितीतही भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मे इ.स. २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. [५३]

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुकयातील आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. तेव्हाच्या तापलेल्या वातावरणात गोपीनाथ मुंडेनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दौरा केला. [५४] गोपीनाथ मुंडे यांनी मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सांत्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. मावळातील आंदोलकांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून माणुसकी नसलेले हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी मुंडे राज्यपालांकडे केली असल्याचे भाजपचे सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. [५५]

लातूर येथून शेतकऱ्यांची शेतकरी दिंडी पायी सुरू होणार असून भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यावेळी उपस्थित रहाणार आहेत. भगव्या वस्त्रातील ५०० वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ६ जिल्हे, १९ तालुके आणि ११० गावे असा ५२५ किलोमीटर प्रवास पूर्ण करून ही दिंडी १२ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहोचणार आहे.[५६]

पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी संपूर्ण भाग पायदळी तुडवत ‘गोदा परिक्रमा’ केली. लोकांचे सुखदु:ख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले. [५७]

महाराष्ट्रातील माफिया राज हटवा यासाठी १४ मार्च इ.स. २०११ रोजी भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने जनजागरण अभियानाअंतर्गत भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे १२ मार्च इ.स. २०११ रोजी सायंकाळी ६ वाजता परभणी जिल्ह्यातील क्रांती चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. [५८]

महाराष्ट्र राज्याचे आघाडी शासन हे सातत्याने शेतमालाला योग्य भाव देण्यात चालढकल करीत असून, शासनाच्या या धोरणामुळे विदर्भातील शेतकरी मरणाच्या दारात ढकलले जात आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची कापूस दिंडी जळगाव जामोद येथून निघणार २९ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी सकाळी ११ वा. निघेल व वरवट बकाल येथे मुक्काम राहील. ३० नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी सायंकाळी ५ वा. दिंडीचा समारोप शेगाव येथे होणार असून, याप्रसंगी लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. [५९]

दहा दिवसांपासून आमदार गिरीश महाजन कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाची भाषा या महाराष्ट्र सरकारला कळत नाही. महाराष्ट्र सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तुमचे उपोषण सुटले तरी हे आंदोलन संपलेले नाही. सोमवारपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आंदोलनाला प्रारंभ होत असून, जोपर्यंत कापसाला सरकार योग्य भाव देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असे आश्‍वासन भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिले. गिरीश महाजन यांचे उपोषण सुरू असताना खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्याची दखल घेण्याची गरज होती. त्यांना वेळ नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवे होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही काळजी नाही. परंतु तसे असले तरी आज गिरीश महाजन यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी संघटित झाला आहे आणि ज्यावेळी शेतकरी संघटित होतो त्यावेळी त्याच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागत असते. म्हणून एक तर आता ‘सरकारला खाली खेचू अथवा कापसाला भाव घेऊ’ याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी दोन्ही सदनांच्या विरोधी पक्षनेत्यांनी गेटवरच मंत्र्यांच्या गाड्या अडवा. त्यांना सभागृहात पाय ठेवू देवू नका, महाराष्ट्रभरात कोणत्याही जिल्ह्यात मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली म्हणजे त्यांना त्याच ठिकाणी घेराव घाला असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.ज्यावेळी कापसाला चांगला भाव होता त्यावेळी निर्यात बंद केली. आता आमच्या कापसाला भाव मिळत नाही. याला जबाबदार सरकारची धोरणेच असल्याने लोकसभेतदेखील या प्रश्‍नावर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. [६०]

ऊस तोडणी वाढवून मिळणार नाहीं तो पर्यंत राज्यातील एका ही कारखाना चालू देणार असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. बीडमध्ये ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते, या वेळी ऊस तोड कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि ऊसतोड कामगार उपस्थित होते. दरम्यान, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चर्चेला बोलावल्याची माहिती मुंडेंनी दिली आहे. येत्या ७ ऑक्टोबर, इ.स. २०११ तारखेला ऊसतोड कामगारांतर्फे मुंडे मोहिते-पाटलांशी बोलणार आहेत. ऊसतोड कामगाराची संख्या दिवसेन्‌दिवस कमी कमी होत असून साध्या स्थितीला राज्यात केवळ तीन लाखच मजूर आहेत. हार्वेस्टर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. हर्षवर्धन पाटलांकडील रजिस्टरमध्ये तो एक असेल मात्र आज मितीला राज्यात १६ लाख ऊसतोड कामगार आहेत. सरकारने हार्वेस्टर मशीन आणून साखर कारखानदारांना पन्नास टक्के सवलत देण्यापेक्षा जर हेच पैसे कामगारांना दिले असते, तर बरे झाले असते असे मत मुंडेंनी व्यक्त केले. [६१]

माझ्या साखर कारखान्यात आणणाऱ्या ऊस उत्पादकांना पहिला हप्ता १६०० रुपये आणि साखरेचे उद्या जर दर वाढले तर त्याचा वाढीव लाभही देण्याची माझी तयारी आहे अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना केली. उद्या जर साखरेचे भाव वाढले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे कारण साखर ज्याद्वारे तयार होते, त्या कच्च्या मालाला-उसालाही वाढीव दर मिळायला हवा. गतवर्षी साखरेचे भाव ३४०० पर्यंत गेले होते. तेव्हा दोन हजार रुपये ऊस उत्पादकांना दिले होते. आज दर २८०० आहेत. तरीही आपण १६०० रुपये देण्यास तयार आहोत. तो संपूर्ण नफा साखर कारखानदारांनी कमवायचा हे मला मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी मांडली. केंद्र सरकारवर हल्ला चढविताना मुंडे म्हणाले, आम्ही निर्यातबंदी उठवावी यासाठी पंतप्रधान, अर्थमंत्री यांनी भेटलो. शरद पवारांना तर अनेकदा भेटलो. पण, त्यांनी फारच फार दोनवेळी ५-५ लाख टन निर्यातीस परवानगी दिली. दुसरी गंभीर बाब म्हणजे देशातच ३५ लाख टन साखर पडून असताना आयातीस परवानगी दिली आणि त्यावरील सर्व अधिभार काढून टाकला. शून्य अधिभारामुळे मोठ्या प्रमाणावर साखर आयात झाली. यातून काहीही साध्य झाले नाही याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले. लेव्हीच्या साखरेचा भुर्दंड कारखान्यावर का, असा सवाल उपस्थित करून मुंडे म्हणाले, सरकारने खुल्या बाजारातील दरानुसार साखर खरेदी करावी आणि त्यावर आवश्यक सबसिडी द्यावी. कारण आज एक हजार रुपये तोटा सहन करून लेव्हीची साखर द्यावी लागते. हे बंधन काढून टाकावे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली. [६२]

राज्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला खरा मात्र ऊसतोड कामगाराचा संपाचा अध्याय मिटला नसल्याने प्रत्यक्ष गाळपाला सुरुवातच झाली नाही. सरकारने ऊसतोड कामगाराच्या संपावर तोडगा काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा लवाद नेमला आहे. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या वाढीव मजुरीसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. मागील २० दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांनी संप पुकारला आहे. १०० टक्के दरवाढ मिळाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा इशारा कामगारांनी घेतला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखान्यांनी बॉयलर पेटवले, मात्र ऊसतोड कामगारांच्या संपामुळे सद्यास्थितीला गाळपाला सुरुवातच झालेली नाही. ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी पवार-मुंडे यांचा लवाद नेमण्यात आला. या लवादामध्ये पवार कारखानदारांचे तर मुंडे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून तोडगा काढणार आहेत. यापूर्वी इ.स. २००८ मध्येही ऊसतोड कामगारांनी अशाच प्रकारचा संप पुकारला होता. त्यावरही हाच लवाद नेमण्यात आला होता. त्यावेळी ५० टक्के वाढीव वेतनाची मागणी केली होती. मात्र ऊसतोड कामगारांना केवळ २५ टक्के वाढीव वेतन मिळाले. शेजारी राज्यात ऊसतोडीसाठी २५० ते ३०० रुपये प्रतिटन तोडीचा भाव असताना महाराष्ट्रामध्ये मात्र १३७ रुपये भाव दिला जात आहे. ऊसतोड कामगाराला विम्याचे संरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांची चर्चा नेहमीच होते मात्र ते प्रश्न आजही तसेच प्रलंबित आहे. [३६]

संघर्ष प्रतिमा

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या हिमतीने केलेले आहे. ते राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. मात्र या दुरावलेल्या लोकांमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. महाराष्ट्रात मुंडे यांचे अनेक मोहरे इतर पक्षामध्ये जात असल्यामुळे मुंडे यांच्या ताकदीवरही परिणाम होत आहे पण अस्तित्व क्षीण झाले नाही. या पडझडीचा फायदा राष्ट्रवादीने घेतला. गोपीनाथ मुंडे यांचे एक निकटचे सहकारी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील हे मुंडे यांच्यावर चिडून राष्ट्रवादीत गेले होते. तिथे त्यांना खासदारही करण्यात आले. परंतु कालांतराने राष्ट्रवादीचे खरे स्वरूप त्यांच्या लक्षात आले आणि ते आता भाजपमध्ये परत आले आहेत. [६३]

गोपीनाथ मुंडे यांचे एक निकटचे सहकारी खासदार व माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले हे काँग्रेसमध्ये गेले होते. [६४] गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक व माजी खासदार हरिभाऊ राठोड २० जून, इ.स. २०११ ला काँग्रेसमध्ये गेले. [६५] भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुंडेंसोबत फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [६६] विमल मुंदडा यांना प्रथम गोपीनाथ मुंडेने आमदार केले. त्यांनी पक्ष बदलला तरी मुंडे कुटुंबाशी स्नेह कायम ठेवला. मुंडेंनी अनेकांना मोठे केले, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या भुलथापांना ते बळी पडले आणि त्यांनी पक्ष बदलला. [६७] गेवराईतील माजी आमदार अमरसिंह पंडित यांनीही वेगळी चूल मांडली आहे. [२८] भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बीडजिल्हय़ातील खंदे समर्थक म्हणून अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहिले जात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [६८] गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय पहिल्यांदा त्यांना सोडून जात आहेत असे नाही. यापूर्वीही टी. पी. मुंडे, विनायक मेटे, बदामराव पंडित, फुलचंद कराड असे कितीतरी नेते त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले. यापूर्वी भाजप सोडलेले फुलचंद कराड, टी.पी. मुंडे, बदामराव पंडित ही मंडळी पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर आहेत. [६९]

गोपीनाथ मुंडे यांचे जावई डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.परभणी जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [७०]

बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ठरवतील ते होते असे मानले जायचे [७१] एकेकाळी बीड जिल्ह्यासाठी गोपीनाथ मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पतसंस्था, बाजार समित्या, जिल्हा बँक, नगरपालिका आदी सत्तास्थानांवर खासदार मुंडेंचा प्रभाव होता. जिल्ह्यात प्रबळ विरोधक कोणीच नसल्यामुळे सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी राजकीय वैभव प्राप्त केले होते, पण नंतर याला ओहोटी लागत गेली. इ.स. २००७ बीड मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये पानगळ सुरू झाली. राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस यांनी खासदार मुंडेंसोबत सवतासुभा करीत राष्ट्रवादीशी सलगी साधली. [७२] इ.स. २००९ विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे भीमराव धोंडे व साहेबराव दरेकर या माजी आमदारांनी मुंडेंसोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. [७३] [७४] इ.स. २०१२ केज विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे माजी डॉ. नयना सिरसाट मुंडेंसोबत सवतासुभा करीत अपक्ष उमेदवारी कायम केली [७५]

अजित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना बीडजिल्हापरिषद निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. [७६] शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जिल्ह्यात धक्का देण्यासाठी पुढाकार घेतला. धनंजय या मुंडे यांच्या नाराज पुतण्याला हेरले आणि त्याला राष्ट्रवादीच्या कळपात आणले. [७७] गोपीनाथ मुंडे आणि थोरले बंधू पंडितअण्णा मुंडे यांच्यातील भाऊबंदकीचा वाद टोकाला गेला. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते गोपीनाथ मुंडेपासून दूर गेले. [७८] उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितराव मुंडे यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावले. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर एकाकी पडलेल्या आणि बीड जिल्ह्यातला एकही मोठा नेता सोबत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडेंच्या दृष्टीने ही खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्वाची लढाई ठरली. तीत आतापर्यंतचे सर्व कसब पणाला लावताना जिल्ह्य़ात तळ टोकून खासदार गोपीनाथ मुंडेंनी एकहाती निवडणूक लढविली आणि जनसमर्थन आपल्या बाजूला वळवण्यात लक्षणीय यश मिळविले. [७९]

बीड जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जनतेनं अजितदादांच्या टगेगिरीला चांगलाच टोला देत मुंडेंना भरभरून मतदान दिलंय. ३५ वर्ष मुंडेंची एकहाती सत्ता असलेल्या परळीत मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी धनंजयची मदत घेलली. मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी मुद्दामहून परळीत प्रचाराचा नारळ फोडला. बीडमध्ये मुंडेंचं घर फोडून पंडितअण्णा आणि धनंजयला राष्ट्रवादीच्या गळाला लावलं खरं पण बीडच्या जनतेनं गोपीनाथरावांच्या बाजूनं कौल देवून अजितदादांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिलंय. बीडला गड राखण्यात मुंडे यशस्वी ठरले आणि त्यांनी दादांच्या टगेगिरीची चांगलीच धोबीपछाड केलीय. मुंडेंचं पानिपत करू असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचे पानिपत झालंय. याठिकाणी पंडितअण्णांचा दारूण पराभव झालाय. फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर एकूणच मराठवाड्यात अजितदादांनी सपाटून मार खाल्ला. गंगाखेडमध्ये मधूसुदन केंद्रेंना आपल्या गोटात घेणाऱ्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय. मुंडेंची ताकद कमी करण्यासाठी केंद्रेंना राष्ट्रवादीत घेतलं खरं मात्र या ठिकाणी केंद्रे अपयशी ठरले. यावेळी गंगाखेडमधील राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलंय. एकूणच काय तर अजितदादांच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला मराठवाड्यातील जनतेनं चांगलंच प्रत्यूत्तर दिलंय. मुंडेंवर केलेली टोकाची टीका आणि घर-घरात फुट पाडण्याच्या दादांच्या राजकारणाला सध्यातरी घरघर लागलीय. फोडा-फोडीचं राजकारण करून सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजितदादांच्या राजकारणाला राज्यातील जनतेनं चांगलीच चपराक दिलीय. [८०]

मागील तीन विधानसभा निवडणुकांत शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होत असल्याचे दिसून आले आहे. युती व सत्ताधारी यांच्यातील मतांचे अंतर फक्त ३ टक्के इतके आहे. ते दूर करून सत्तेत पुन्हा यायचे असेल तर नवीन राजकीय समीकरणे जुळवावीच लागतील असे मत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले. शिवसेना आणि मनसे एकत्र येतील की नाही हे सांगता येणार नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी युतीला नवे मित्र जोडावे लागतील. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेची साथ मिळाल्यास मतांचे गणित बेरजेत आणि सत्तेत जाण्यात बदलू शकते असेही मुंडे म्हणाले. [८१] आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरपीआयला सोबत घेऊन लढविणार असल्याचे भाजप नेते खा. गोपीनाथ मुंडे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना खा. मुंडे म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये युती बरोबर आरपीआयला सोबत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीची सत्ता येईलच असा ठाम विश्वास खा. मुंडे यांनी व्यक्त केला. [८२] देशात किंवा राज्यांमध्ये एका पक्षाची सत्ता येऊ शकत नाही असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून हटवायचे असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे अशी लोकभावना आहे. याचा अंदाज घेवून शिवसेना आणि मनसे यांनी आगामी राजकीय वाटचालीचा विचार करावा आणि अहंकार सोडून विधायक भूमिका घेवून एकत्र यावे, मनसेसोबत भाजप-सेनेने युती करावी या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका झाली असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात तोच विषय असल्यामुळे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याच प्रस्तावाचा पुनरूच्चार नांदेड येथील भाजपचाविभागीय मेळाव्यात केला. मुंडे यांनी महायुती होण्याची गरज प्रतिपादित केली. [८३]

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर विजयी झाल्याची प्रतिक्रिया विचारली असता मुंडे म्हणाले की, अजितदादांच्या मनमानी कारभाराला मतदारांनी दिलेले हे चोख उत्तर आहे. सत्तेचा माज, टगेगिरी आणि मस्तीची भाषा त्यांच्या डोक्यात शिरली होती. पण, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या युतीनंतर मिळालेला हा पहिलाच विजय आहे. या युतीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे मतदारांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मार्ग मोकळा करून दिला असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाले की, जनता चांगल्या पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय त्यांना सापडला आहे. [८४]

राजकीय सिद्धांत

महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप आपला असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. शिखर बँकेतील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.[८५] शिखर बँकेतील पाचशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. शिखर बँकेतील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी का नको? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जवाबदार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय. [८६]

सहकारातील अपप्रवृत्तींना गाडण्यासाठी सहकारातील गरकारभाराविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची केलेली मागणी समारोप सत्रातील अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. [८७] जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून अटक झालेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजून मंत्रिपदावर कसे, असा सवाल भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. देवकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे, पण पक्षाने तो स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच भ्रष्टाचाराला पाठीशी घालते, असा आरोप करून देवकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. [८८]

भाजप पक्षाची महाराष्ट्रात सत्ता असताना एन्रॉनचा वाद बराच गाजला. या पक्षाचे धडाडीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेऊन एन्रॉनचा दाभोळ येथील प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला आणि नंतर पुन्हा वर काढला. दरम्यानच्या काळात एन्रॉनचे केनेथ ले आणि रिबेका मार्क भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भेटले आणि प्रकल्प सुरू करण्याच्या मार्गातील अडचणी जाणून घेतल्या. [८९]

मुंबईमधये विक्रोळीत झालेल्या महायुतीच्या पहिल्याचं सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. मधू कोडा झारखंडचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी दहा हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आणि त्यातील बरेच पैसे हे कृपाशंकरसिंह यांच्याकडे आले असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. काँग्रेस सरकारने आपले नेते सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचारासाठी आत टाकलं, मग कृपाशंकरसिंह यांची चौकशीही का केली नाही, असा सवालही गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. [९०]

महाराष्ट्र जनता काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून बहुतांश जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. देशात आणि राज्यात इ.स. १९७५ वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसची भ्रष्ट आणि घोटाळ्याची सत्ता उलथून टाकण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे’, असा पुनरूच्चार लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केला होता. [८३]

देशात आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. अशा परिस्थितीत ता. १५ ऑगस्टपूर्वी फक्त दुष्काळ निवारणाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घ्यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मुंडे म्हणाले देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठीचे धोरण निश्‍चित केलेले नाही किंवा युद्धपातळीवर ठोस पाऊले उचललेली नाहीत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील खरिपाचे पीक हातात येईल असे वाटत नाही. जुलै महिना संपत असताना राज्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. १९७२च्या दुष्काळासारखी मराठवाड्यात परिस्थिती आहे. मराठवाड्यातही गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. जुलै महिन्यातही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. दुष्काळाने पाण्याची पातळी घटली आहे, पण राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये. केवळ राजकीय सूडबुद्धीने बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. सध्याच्या दुष्काळ परिस्थितीवर शासनाचे उदासीन धोरण आहे. दुष्काळ निवारणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही. अशा जिल्ह्यांचे ग्रुप करून त्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे चारा आणि पिण्याच्या पाण्याचे गावपातळीपर्यंत नियोजन केले पाहिजे. ऑक्‍टोबर महिन्यात रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, त्याचीही तातडीने उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा श्री. मुंडे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे खरिपाची आणेवारी सप्टेंबरमध्ये तर रब्बीची आणेवारी जानेवारीत जाहीर करण्याचा जो महसुली कायदा आहे, त्यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता अप्रत्यक्ष अनुदान देण्याऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांपर्यंत द्यावे. यासाठी पुस्तकी कायदा नको, तर वस्तुस्थितीला धरणारा कायदा आणला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली. [९१]

२६/११च्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहशतवाद रोखण्यास असमर्थ ठरल्याची टीका मुंडेंनी केली. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यास असमर्थ ठरले आहे आणि याच महागाईच्या भस्मासुरामुळे भविष्यात पेट्रोलचा दर १०० रुपये लिटरवर पोहोचेल अशी भीती मुंडेंनी व्यक्त केली. तर किरकोळ बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीबद्दल गोपीनाथ मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात सामान्य व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोठमोठ्या कंपन्या काबीज करतील असे ते म्हणाले. [९२]

केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनही भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याची टीका करीत भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे म्हणाले- स्वातंत्र्यानंतर जेवढे घोटाळे झाले, त्यापेक्षा मोठे घोटाळे केंद्र शासनाने केले आहेत. आदर्शच्या घोटाळ्यामुळे तर उभा महाराष्ट्र बदनाम झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे पाप केले आहे. महाराष्ट्रातील बलात्कार, गुन्हे, अपहरण, दंगलींच्या घटनावर प्रकाश टाकताना खासदार मुंडे म्हणाले- कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे. [९३]

भाजप सांसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच रालोआतील सर्व खासदारांनी आपले विदेशात कुठेही बँक खाते नाही आणि विदेशी बँकांमध्ये काळा पैसाही नाही, अशा आशयाचे शपथपत्र येत्या दोन ते तीन दिवसात सादर करावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे शपथपत्र लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना दिली. [९४]

गोवा विधानसभा निवडणूक इ.स. २०१२ च्या प्रचारासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना गोव्यात पाठविले. [९५]

हिंमत असेल तर यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकापूर्वी बेकायदेशीर खाणीवरील एम. बी. शाह यांचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले. [९६]

इ.स. २०१२च्या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपल्या नेत्यांची यादी तयार केली असून, त्यात गोपीनाथ मुंडे यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांना तर उत्तर प्रदेशातील पक्षाचे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश व पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांची एक यादी भाजपने निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.भाजपच्या या यादीत लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे [९७]

आता ५० टक्के महिला आरक्षणाचा निर्णय झाला असल्याने महिलांना राजकारणामध्ये फार मोठी संधी आहे. ज्या ठिकाणी महिला आरक्षण नाही तेथे मात्र योग्य उमेदवारांना संधी देण्यात यावी. मात्र, पक्षाला भविष्यात पुन्हा उभारी आणायची असेल, सत्ता आणून द्यायची असेल, तर जो कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत आहे. त्यालाच उमेदवारी द्या असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले. महागाईच्या मुद्यावरून, परदेशातील काळा पैशाबद्दल बोलण्यास सरकार संसदेमध्ये तयार नाही. काँग्रेसच्या तीन खासदारांचे काळे धन विदेशात असल्यामुळेच सरकार पळवाटा शोधत असल्याचा आरोप करून गोपीनाथ मुंडे म्हणाले, देशात दहशतवादाने थैमान घातले आहे. कसाबला बिर्याणी खाऊ घालत आहेत. तर तिकडे अफझल गुरूला केंद्र सरकार पोसत आहे. कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या पीडितांवर हे सरकार काठ्या चालवीत आहे. अमानुषपणे वागणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून या उद्दाम सरकारची सत्ता भाजप उलथवून टाकेल, असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिला. केंद्रातील आघाडी सरकार रिटेल क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचा विचार करीत आहे. परंतु, अशी मान्यता मिळाल्यास देशातील किमान १० कोटी लहान व्यापाऱ्यावर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. केंद्र सरकार घेत असलेला हा निर्णय देशातील व्यापाऱ्यांच्या विरोधात असून, आधीच महागाईने होरपळेल्या जनतेलाही याची झळ बसणार आहे. जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करून या विधेयकाला संसदेमध्ये भाजप संपूर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याची घोषणा भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. [९८]

अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना पाठविले.जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच संसदेत सादर व्हावे, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी अण्णांना सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनलोकपालावर आधारित कठोर लोकपाल कायदा हवा, या मुद्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णांना पाठिंबा देत असल्याचे मुंडे यांनी अण्णांना सांगितले. जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच्या तीन मुद्यांबद्दल सरकारने मौन बाळगले असताना तेच मुद्दे भाजपच्या नोटिशींत समाविष्ट केले आहेत, असेही मुंडे यांनी अण्णांच्या लक्षात आणून दिले. अण्णांची भ्रष्टाचार संपविण्यासाठीची प्रामाणिक तळमळ व मुद्द्यांवरचा ठामपणा प्रभावित करणारा आहे, असे निरीक्षण मुंडे यांनी नोंदविले. [९९]

लोकपाल विधेयकाबाबत लोकसभेतील चर्चेसाठी सरकार ही चर्चा नियम १९३ अन्वये घेण्यावर आग्रही असली तरी भाजप मात्र ही चर्चा नियम १८४ अंतर्गतच व्हावी, यासाठी आग्रही आहे. भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी अनंतकुमारांसह अण्णा हजारेंची आज रात्री भेट घेऊन भाजपचा जनलोकपाल विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे आणि नियम १८४ अंतर्गतच ही चर्चा आम्ही घडवून आणू, असे आश्‍वासन त्यांना दिले. [१००]

भाजपची भूमिका विशद करताना जनलोकपाल विधेयकावरील ठराव किंवा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी आला तर, अण्णा हजारे यांनी ज्या तीन महत्त्वाच्या मागण्या ठेवलेल्या आहेत, त्या मागण्यांच्या समर्थनार्थ भाजप मतदान करेल, असे प्रतिपादन भाजपच्या वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. [१०१]

भारतात इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) समाजातील संख्या पाहता केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे तसेच जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी, असे मत गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केले.ओबीसी महिलांसाठी लोकसभेत वेगळ्या आरक्षणाचीही त्यांनी यावेळी मागणी केली. ओबीसी समाजाने लढायला तयार राहिले पाहिजे. मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींसाठी देशभर चळवळ करायची असल्यास त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे, असे मुंडे यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतले भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.[१०२]

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यार्पण व कायदेशीर कारवाई करण्यासाठी भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दर्शविला. संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत “आंतरराष्ट्रीय कायदा आयोग’ या विषयावर न्यूयॉर्क येथे बोलताना खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले, गुन्हेगारांना कुठल्या ना कुठल्या देशात शिक्षा मिळते, हे दिसून आले की त्यांना वचक बसेल. ज्या देशात गुन्हा केला आहे किंवा ते ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या देशात त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. गुन्हेगारांचे प्रत्यार्पण किंवा कायदेशीर कारवाईला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सीमेपलीकडील खनिज तेल व गॅसच्या वाटण्या भौगोलिक, प्रादेशिक, लोकसंख्या आदी बाबींचा विचार करून द्विपक्षीय चर्चेतून करण्यात याव्यात. कोणते नियम करून हे वाटप केले, तर त्याचे परिणाम द्विपक्षीय चर्चेवर होतील. या बाबीचे सार्वत्रिकीकरण केले तर ते अधिक गुंतागुंतीचे होईल, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. [१०३]

संक्षिप्त परिचय

अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा पुणे,जिल्हा मुंबई [१०४]
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई [१०५]
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बीड [१०६]
अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड [१०७]
अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड [१०८]
अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा सोलापूर [१०९]
संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा बीड

  • इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
  • इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
  • इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
  • इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
  • इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
  • इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
  • इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
  • इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव
  • इ.स. १९८५ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
  • इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
  • इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
  • इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५)
  • इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
  • इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
  • इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
  • इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
  • इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
  • इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
  • इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
  • इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
  • इ.स. २००९,११ जूलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
  • इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
  • इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
  • इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
  • इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला
  • इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
  • इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
  • इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे
  • इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यूयॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व
  • इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
  • इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
  • इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
  • इ.स. २०१४ : ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन.
गोपीनाथ मुंडे जीवनचरित्र
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top