महाराष्ट्र

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांच्या

नगरपरिषदेबाबत लवकरच निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 11 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात यावी यासंदर्भातील मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भातील सूचना व हरकतींवरील सुनावणी सुरु असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल, असे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, या 27गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीसंदर्भात 7 सप्टेंबर 2015रोजी अधिसूचना काढण्यात आली होती. यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावरील सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी न दिल्याने सुनावणी बाकी होती.  आता सुनावणी सुरु झाली आहे. याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल  असेही ते म्हणाले.

या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, भाई जगताप, श्रीमती विद्या चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

००००

मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई;

पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 11 : मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी आलेल्या अर्जांची पात्रता तपासणी सुरु असून कोणताही पात्र लाभार्थी या भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पाने बाधित झालेल्या नवी मुंबईतील मरिआई सहकारी मच्छीमार संस्थेच्या प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण योग्य झाले नसल्याबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री.शिंदे बोलत होते.

श्री. शिंदे म्हणाले, प्रकल्पाच्या विशिष्ट परिघात येणारे लोक यासाठी पात्र ठरतात. यात आतापर्यंत सुमारे 14हजार 951 एवढे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 5 हजार 500 लोकांची पात्रता तपासून त्यांना भरपाई देण्यात आली आहे.  उर्वरित अर्जांच्या पात्रतेची तपासणी सुरु आहे. यात कायमस्वरूपी नुकसान झालेल्या बाधितांना 5 लक्ष 84 हजार एवढी रक्कम दिली. सर्वेक्षण करून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्यात येते. ही भरपाई देण्यासाठी आतापर्यंत मत्स्यव्यवसाय विभागाकडे 49 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.  मरिआई सहकारी मच्छीमार संस्थेच्या मागणीनुसार 1226 मच्छीमारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करून 61 सभासद मच्छीमारांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या आणि नुकसान भरपाईच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रसाद लाड, भाई गिरकर, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.

००००

निवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती विशिष्ट कालावधीसाठीच

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 11 : सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी आणि केवळ विशिष्ट कालावधीसाठीच घेण्यात येतात. अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. भरणे म्हणाले, निवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही केवळ 1 ते 3वर्षांपर्यंत केली जाते. फायदा पायाभूत सुविधांची निर्मिती, योजनांचे मूल्यमापन, नागरी सेवा, भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग, सिंचन आदी प्रकल्प मार्गी लागणे या कामी मदत होते. नवीन पदभरतीच्या प्रक्रियेसाठी शासन सकारात्मक असून  न्यायालयात याबाबत निर्णय प्रलंबित असल्याने पदभरती थांबली होती.  राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत येण्याची संधी मिळावी यासाठी पदभरती लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सध्या राज्यात 7 लाख 35 हजार एवढी पदे असून त्यापैकी 5लाख 85 हजार पदे भरलेली आहेत. उर्वरित रिक्त पदांवरील पदभरती लवकरच करण्यात येईल.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, नागोराव गाणार, भाई जगताप आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/11.3.2020

Most Popular

To Top