महाराष्ट्र

प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत त्वरित सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 13 : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील देवधरी गावाचे पुनर्वसन करण्यासह अंशत: बाधित गावांनाही ही तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.  अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

पेनटाकळी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत सदस्य श्वेता महाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, या गावांच्या पुनर्वसनाबाबत समावेश केलेला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावाबाबत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळान्वये राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीत निर्णय घेण्यात आला असून, या गावांच्या तातडीने पुनर्वसनासंदर्भातील प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कारवाई करण्यात येईल.

प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रशासकीय मान्यतेस प्रचलित दराने मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल जेणेकरून कोणत्याही प्रकल्पाच्या कामास विलंब होणार नाही.

सदस्य राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणेबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री श्री. पाटील म्हणाले, तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलुज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहे.

उजनी धरणात जेवढा गाळ वाढला आहे, त्यामुळे डेड स्टोरेजची क्षमता कमी झाली आहे. बुडीत बंधारेबाबत समिती नेमण्यात आली होती. बुडीत बंधारे बांधुन पिण्यापुरते पाणी वापरावे अशी सूचना समितीने केली आहे. ती स्वीकारून अत्यंत आवश्यक असल्यासच असे बंधारे बांधण्याचा विचार करण्यात येईल. अशीही माहिती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

००००

Most Popular

To Top