महाराष्ट्र

कोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा

· राज्यातील काम समाधानकार; परंतु प्रसार थांबविण्यासाठी अधिक जागरूकतेची गरज असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन
· नागरिकांसाठी हेल्पलाईन कार्यरत ठेवण्याची सूचना
मुंबई, दि. ६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यातील वाढत चाललेले कोरोना संक्रमण थांबविण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

कोरोनाविरुद्ध लढ्यामध्ये राज्याने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी तसेच कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.


प्रत्येक जिल्ह्याने लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन कार्यरत ठेवावी, अशीही सूचना श्री. कोश्यारी यांनी यावेळी केली.

राज्यात कोरोनाच्या केसेस देशात सर्वाधिक आहेत. राष्ट्रपतीदेखील नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादृष्टीने राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या व सद्यस्थिती, शासन करीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता, स्थलांतरित कामगार, मजूर व बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनाची व्यवस्था, शेतमालाची विक्री होण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, मदत कार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.    

स्थलांतरित कामगार, मजूर व बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वांना भोजन, औषध आदी सुविधा देण्यासोबत तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अशी सूचना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केली. 

आरोग्य सेवा, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांना शाबासकी

कोरोनाविरुद्ध लढ्यात आघाडीवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्यक सुविधा पुरविणारे लोक अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तपस्व्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.   

मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह व नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने तसेच मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पुणे, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अखत्यारीतील कोरोना व स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेची माहिती दिली.

000

Most Popular

To Top