महाराष्ट्र

हनुमान जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा

हनुमान जयंती तसेच शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे केले आवाहन

मुंबई, दि. 7 :- कोरोनाचे संकट पाहता हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे सांगून हनुमान जयंतीला, उद्या घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, तसेच धार्मिक कार्यक्रम घरीच करावे असेही त्यांनी म्हटले आहे.

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येकाचे आज एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे, कोरोनाला प्रसाराची संधी न देणे आणि कोरोनाची साखळी तोडणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, तसेच धार्मिक कार्य घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाईल. कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Most Popular

To Top